"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Sunday, April 21, 2013

महाराष्ट्र टाईम्स : नैतिकतेचा बुरखा...


मराठी वृत्तपत्रांची स्थिती आजघडीला काही विशेष चांगली नाही. नाव घेण्यासारखी वृत्तपत्रे अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्याएवढी. त्यातही जसा संपादक असेल तशी दिशा वर्तमानपत्रे घेतात याचाही मराठी वाचक साक्षीदार आहे. ‘जुन्याकाळ’ च्या एका वर्तमानपत्रात एका ‘नव’ पक्षाबद्दल आणि त्याच्या नेत्याबद्दल बातम्या/अग्रलेख छापून येत होते. मग कार्यकर्ते त्याच्या जम्बो झेरॉक्स काढून पक्षाच्या फलकावर लावत असत! ‘परस्परं प्रशंसन्ति’ अशातलाच काहीसा हा प्रकार! असो.

‘लोकसत्ता’ चा मध्यंतरीच्या काळातला हिंदूविरोध/हिंदुत्वविरोध हा स्पष्टपणे पूर्वग्रहदूषित होता. त्यात काही कोर्ट केसेस झाल्या ज्या चालू आहेत आणि ज्यात संबंधितांनी घाबरून सपशेल माफी मागितल्याचेही समोर आले आहे. या साऱ्या प्रकारामुळे मग संबंधितांची उचलबांगडी म्हणा वा हकालपट्टी म्हणा; जे काही झाले त्यानंतर लोकसत्तेची दिशा पुन्हा बदलली. पण पूर्वीपासूनच लोकसत्ताच्या पुरवण्या वाचनीय असतात. चतुरंग आणि लोकरंग तर संग्राह्य असतात. त्यातले ‘दोन फुल एक हाफ’, ‘ऐकावे ते नवलच’, ‘मुक्तपीठ’, अशी काही सदरे तर कायम लक्षात राहतील.

सकाळ हे वर्तमानपत्र मला फार सुबक आणि स्वच्छ वाटते. स्वस्त असूनही उत्तम छपाई, सुंदर फॉण्ट आणि बातम्याही एकांगी वाटत नाहीत. श्री. कांबळे यांचे लेखनसुद्धा मला खूप आवडते. सकाळच्या पुरवण्यासुद्धा वाचनीय असतात.

पुढारी सुद्धा वाचनीय आहे. हिंदुत्वाबद्दल सडेतोड भूमिका, अन्यायाची चीड, बहुजनांची कदर हे या वृत्तपत्रातून स्पष्टपणे दृग्गोचर होते. मुंबईत तूर्तास विशेष वितरण नसल्याने वाचकांना पुढारी अजून समजलेला नाही.

महाराष्ट्र टाईम्स म्हणजे तर आंग्लाळलेला पेपर! आज दुर्दैवाने अशी स्थिती आहे की, अगदी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ ची भाषांतरित आवृत्ती म्हणून जरी काढली तरी म.टा. चा दर्जा सुधारेल. धर्माच्या नावाने बोटं मोडायची, ‘सेक्युलर’ आहोत हे दाखवण्याची जी स्पर्धा आहे त्यात अग्रेसर होण्याचे स्वप्न पहायचे आणि शिवाय मुखपृष्ठावर वर मध्यभागी गणपतीचे दररोज वेगळे चित्र छापायचे हा कुठला दुटप्पीपणा? स्वीकारा की हिंदू संस्कृती या देशाचा मूलाधार आहे. सोंग टाकाल तेव्हाच शक्य होईल ना ते! असो. सामाजिक कार्यात बरीच दशके असलेल्या बाईंना मध्यंतरी भेटण्याचा योग आला तेव्हा त्या म्हणाल्या की ‘म.टा. वाचलात तर निद्रेतच राहाल.’ खरे वाटते ते. म.टा. ची वेबसाईट म्हणजे तर अश्लीलतेच्या सीमारेषेवर रेंगाळणारी  बनावट सज्जन व्यक्ती वाटते. कुणाला वाटेल की मी म.टा. ला लक्ष्य करतो आहे. पण अजूनही मी सध्याचा संपादक कोण आहे, विचारधारा काय आहे इत्यादी तपशील अजिबात तपासलेले नाहीत. आणि पुढेही कधी पहावे असेही वाटत नाही. पण आज कित्येक मराठी घरांमध्ये म.टा. जातो आणि त्यात लोकांचे विचार, भूमिका बदलण्याची ताकद आहे म्हणून या लेखात प्रामुख्याने म.टा. वर टीका केली आहे.

दिल्ली बलात्काराची घटना घडल्यानंतर सर्वांनीच स्वाभाविकपणे संताप, शोक व्यक्त केला. काळजीचे वातावरणही तयार झाले. प्रसारमाध्यमांनी समाजमनाच्या जडणघडणीत खूप महत्वाची भूमिका बजावायची आहे. पण आज दुर्दैवाने समाजाची नीतीमूल्ये ढासळायला प्रसारमाध्यमेही जबाबदार आहेत. चित्रपट, टी.व्ही. मालिका यांचा तर विचारच नको पण वर्तमानपत्रेसुद्धा स्त्रीचे चित्रीकरण अशा पद्धतीने करताना दिसतात की कुटुंबात आपला पेपर जातो त्यात शाळकरी मुले-मुली असतात या गोष्टीचा जणू त्यांना विसरच पडलेला आहे.

दिल्ली बलात्कार घटनेनंतर म.टा. ने १९ डिसेंबर २०१२ च्या आपल्या अग्रलेखातून कोण नैतिकतेचे धडे दिले. ‘राष्ट्राचा विचार’, ‘स्त्री-पुरुष नात्याची घट्ट वीण’, ‘स्त्रियांची असुरक्षितता’ असे तारे तोडले आहेत. आणि शिवाय पुढे म्हटले आहे, आपल्या मिथक कथांमध्ये तरुणींच्या छेडखानीच्या कथांना एक रोमँटिक वलय प्राप्त झाले आहे .तरुणवयात पुरुषांना ते आपल्या मर्दानगीचेही लक्षण वाटते . पण याच कारणामुळे ग्रामीण भागातील लहान मुलीआणि तरुणी कायम भयाच्या सावटाखाली जगत असतात . गावपातळीवर मुलींच्या शाळागळतीचे मुख्य कारण हीछेडछाडच आहे . परंतु कौटुंबिक पातळीपासून पोलिसस्तरापर्यंत कोणालाही तो गुन्हा वाटत नाही . शहरातहीस्थिती वेगळी नाही . स्त्रियांकडे रोखून बघण्यात पुरुषांना गैर वाटत नाही . यात पांढरपेशे आणि पापभिरूम्हणवणारेही पुरुष असतात . आपल्या नजरेचा समोरच्या व्यक्तीला त्रास होत असेल , हे त्यांच्या गावीही नसते.पुढे अग्रलेख म्हणतो, “बाई ही भोगवस्तू आहे हे समजण्याची सुरुवात इथून होत असते आणि पुढे तो अनेकांना आपला हक्क वाटतो .पण स्वतः महाराष्ट्र टाईम्स या अशा प्रकारच्या भोगवस्तू दृष्टीकोनाला कारणीभूत आहे हे सोयीस्कररित्या विसरतो. कारण स्वतः म.टा. च्या वेबसाईटवर स्त्रीला ‘भोगवस्तू’ मानून स्त्रीदेहाचे उत्तान प्रदर्शन असलेले हजारो फोटो आहेत. त्यातले वानगीदाखल काही खाली दिले आहेत.

हे एकाच समाजपुरुषाचेदोन चेहरे आहेत . आपण आपल्या आरशाची काच एकदा फोडून टाकावी , म्हणजे कळेल की पलीकडे आणखी एकचेहरा आहे आणि तो हिंस्र आणि विद्रूप आहे . हे वरील अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे म.टा. ला देखील लागू होते.  

जाहिरातींवर हल्ली पेपर चालतो म्हणतात. जाहिराती छापून उरलेल्या जागेत बातम्या छापायच्या अशी काहीशी परिस्थिती उद्भवलेली आहे. म्हणून पहिले पान असते एखाद्या गृहनिर्माण प्रकल्पाची जाहिरात. पण या जाहिराती जर अश्लील, बीभत्स असतील तर त्याला ठाम नकार देण्याचे धैर्य वृत्तपत्राने दाखवायला हवे. म.टा. चे वरील चित्र आणि व्हिडिओ प्रकरण हे कुणाला वाटेल जाहिरात म्हणून आहे. वेबसाईट चालवायची तर अशा जाहिरातीतून महसूल मिळेल इत्यादी. पण तसे नाही. वस्तुस्थिती अशी आहे की म.टा. स्वतः यात ‘रस’ घेऊन या फोटोज चे संकलन आणि प्रदर्शन करतो आहे.
म.टा. च्या नक्की कोणाची निवड? ताजं टवटवीत???
पहा वरील चित्रातील लाल चौकट. ‘आमची निवड’?!? ‘sexy models in bikini’ आणि ‘Lesbian Photo shoot for a cause!” ही यांची निवड? हे निवडीला बसले होते अशी सर्व चित्रे घेऊन? आणि त्यात ही त्यांनी निवडली त्यांना भावली म्हणून! हा म.टा. चा कोणता चेहरा म्हणायचा? की आंग्लाळलेल्या त्यांना यात काहीच वावगे वाटत नाही? टाईम्स ऑफ इंडिया ‘बॉम्बे टाईम्स’ या नावाने जी काही निरुपयोगी रद्दी वाचकांच्या गळ्यात मारतो त्याचेच हे मराठी स्वरूप तर नसेल? प्रश्न खूप झाले पण उत्तर साधे आहे. महाराष्ट्र टाईम्स ने त्वरित हा प्रकार थांबवावा आणि अश्लील चित्रांचे प्रदर्शन आणि त्याला देण्यात येणारे प्रोत्साहन हे थांबवावे. अन्यथा मराठी वाचक नक्कीच याचा गांभीर्याने विचार करतील. 
म. टा. च्या निर्लज्जपणाचा कळस


Wednesday, March 27, 2013

विश्व स्वामी विवेकानंदांचे - लेखांक ३

स्वामीजींनी पश्चिमी विचारजगताला तर हलवून सोडलेच परंतु भारताचीही अखंड परिक्रमा करून त्यांनी ठिकठिकाणी जी भाषणे दिली ती आपल्याला आजही मार्गदर्शक आहेत.

स्वामीजींच्या काळातला भारत म्हणजे अखंड भारत. ज्यात आत्ताचा पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इत्यादींचाही समावेश होता. या भागातसुद्धा हिंदू वस्ती मोठ्या प्रमाणावर होती. स्वामीजींनी लाहोरमध्ये केलेल्या एका अत्यंत महत्वपूर्ण भाषणाचा आज आपण या लेखात विचार करणार आहोत. स्वामीजींची सभा तेथील आर्य समाज व सनातन धर्म सभा यांनी आयोजित केली होती. त्यात स्वामीजींनी “The common bases of Hinduism” या विषयावर भाषण केले.

आजच्या भारतवासीयांसाठी तर या भाषणातून राष्ट्रीय एकत्मतेसाठीचे आवश्यक पैलू स्वामीजींनी प्रकट करून दाखवले आहेत. ज्या भागात स्वामीजी बोलत होते तेथे पंजाबी-शीख संप्रदायाचे प्रमाण खूप अधिक असल्याने त्यांनी आपल्या भाषणात गुरु नानकांचे उदाहरण देऊन सुरुवात केली आणि मग गुरु गोविंद सिंहांचे उदाहरण दिले. गुरु नानक यांनी ज्याप्रमाणे आपले बाहू पसरून सर्वांना प्रेमाचे आवाहन केले आणि केवळ हिंदू अथवा मुसलमानच नव्हे, तर अख्ख्या जगाला कवेत घेण्याची क्षमता दर्शविली त्याप्रमाणे आपण आपली अंतःकरणे प्रेमाने ओतःप्रोत भरण्याची आवश्यकता आहे. या प्रेमाचा दाखला देऊन पुढे स्वामीजी गुरु गोविंद सिंहांच्या वीरत्वाचा गौरवपूर्वक उल्लेख करतात. आपल्याच लोकांसाठी लढून, रक्त सांडून जेव्हा त्याच लोकांनी त्यांची साथ सोडली तेव्हाही न चिडता, न रागावता गुरु गोविंद सिंह एखाद्या शरविद्ध घायाळ सिंहाप्रमाणे दक्षिण भारतात निघून गेले. परकीयांशी ते झुंजले; पण स्वकीयांशी त्यांनी वैर नाही मांडले. शक्तीबरोबरच असे प्रेम आपण आपल्या मनात जागृत ठेवायला हवे.
आपण हिंदू अनेक पंथ-उपपंथ, संप्रदाय, वैचारिक गट यात विभागले गेलो आहोत. मुक्त विचार करायचा म्हणजे अशा विविध पंथांचा उदय होणं हे साहजिकच आहे. पण त्यातूनही आपल्याला एकात्मता साध्य करावीच लागेल. आणि ती करण्यासाठी आपल्याला सर्वांना आपली हृदये विशाल करावी लागतील. राष्ट्राच्या एकतेचे उदात्त ध्येय समोर ठेवून वरवर दिसणारे भेद बाजूला सारून मूलगामी एकत्वाचा वेध घ्यावा लागेल. भांडणे पुरे झाली. संघर्ष खूप झाले. आता प्रेमाने जिंकावयास हवे.

आपण सारे ‘हिंदू’ आहोत. ‘हिंदू’ हा शब्द वापरल्यावर स्वामीजी म्हणतात की ‘हिंदू’ या शब्दाला आज कोणताही अर्थ प्राप्त झाला असूद्या, (लक्षात हे घ्यावयास हवे की त्यावेळची परिस्थिती खचितच अभिमानाने आणि निर्भयपणे हिंदू असण्याचा उच्चार करण्याची नव्हती) पण मी मात्र ‘हिंदू’ या शब्दाचा उल्लेख गौरवपूर्वकच करतो आहे. आपण आपल्या कर्तृत्वाने जगाला हे दाखवून देऊ की जे अध्यात्मिक आहे, गौरवपूर्ण आहे ते म्हणजेच हिंदू! आणि जगातल्या कोणत्याही भाषेतील सर्वोच्च, पवित्रतम असा शब्द म्हणजे हिंदू. आपल्या पूर्वजांचा अभिमान आपण बाळगायला हवा. जेवढा आपल्या भूतकाळाचा अभ्यास आपण करू तेवढा हा अभिमान अधिकाधिक वाढतच जाईल. तेव्हा आपल्या रक्तात हा अभिमान भरून घ्या आणि जगदुद्धारासाठी तयार व्हा. तुम्ही तेव्हाच स्वतःला हिंदू म्हणवून घेऊ शकता जेव्हा ‘हिंदू’ या शब्दाच्या केवळ उच्चारणानेही तुमच्या शरीरातून विजेची लहर सळसळून जात असेल.

पुढे स्वामीजी ‘आपले राष्ट्र’ या बिंदूचे विश्लेषण करतात. ज्याप्रमाणे व्यक्तीला कर्माचा सिद्धांत लागू होतो त्याप्रमाणे अगदी राष्ट्रांच्या बाबतीतही तो लागू होतो. प्रत्येक राष्ट्राला ठराविक कार्य करायचे आहे. आपली स्पष्ट भूमिका बजावायची आहे. लहानपणी आपण कथा ऐकल्या असतील की, सातासमुद्रापार एक पक्षी असतो आणि एखाद्या व्यक्तीचा प्राण त्याच्यात असतो. तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला कितीही मारा, काहीही करा..त्या पक्ष्याचा प्राण आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला काही होत नाही. तसेच प्रत्येक राष्ट्राचा ठराविक एका गोष्टीत प्राण असतो. ती गोष्ट असेपर्यंत ते राष्ट्र अस्तित्वात राहते. टोळधाडीसारखी आक्रमणे आणि नृशंस संघर्ष होऊनही इथली जमात टिकाव धरून राहिली. आणि केवळ विजयाने उभीच राहिली नाही तर आक्रमणांचा करायला सज्ज झाली. कारण इथल्या पूर्वजांनी आपल्याला असा विचार दिला जो केवळ विज्ञानाच्या प्रगतीने साध्य होणार नाही. वेद आणि उपनिषद यातून असे विचार आपल्यात रुजवले गेले की जे आज पिढ्यानपिढ्या पुढे संक्रमित होत राहिले आहेत आणि आपल्या धमन्यांमधील रक्ताच्या बिंदू-बिंदूमधून वाहत आहेत. हा हिंदुत्वाचा विचार आपण जोपर्यंत आपल्यात टिकवून ठेऊ आणि पुढे संक्रमित करू तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक संकटातून आपण भक्त प्रल्हादासारखे तावूनसुलाखून बाहेर पडू. 

आपल्या देशात अनेक संप्रदाय निर्माण झाले आहेत आणि होतही राहणार आहेत परंतु सांप्रदायिक झगडे व्हायला नकोत. संप्रदाय असावेत पण सांप्रदायिकता नसावी. म्हणून आपल्या पूर्वजांनी म्हणून ठेवले ‘एकं सत् विप्राः बहुधा वदन्ति’ म्हणजे सत्य एकच आहे पण विद्वान त्याला विविध नावांनी संबोधतात. तेव्हा हा विचार शैव, वैष्णव, गाणपत्य, बौद्ध, जैन, शीख अशा सर्वांनीच मनाशी धरून एकात्मतेचा पुनरुच्चार केला पाहिजे.

पुढे स्वामीजींनी ईश्वर संकल्पना, इथल्या हिंदूचे ईश्वराबद्दलचे सर्वसाधारण मत, उपनिषदातील आत्मन् हा विचार, आत्म्याचे अमरत्व या आणि अशा गोष्टींवर सुंदर विवेचन केले आहे. हा लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे. त्याचे मनन-चिंतन करण्यासारखा आहे. 

Saturday, March 9, 2013

विश्व स्वामी विवेकानंदांचे - लेखांक २.

लेख क्र. १ वाचा - http://vikramwalawalkar.blogspot.in/2013/02/blog-post.html

थोरांचे बालपण सुद्धा थोरच असते. त्यातले प्रसंग हे त्यांच्या आयुष्याची दिशा आणि ध्येय स्पष्ट करणारे असतात. श्रीराम, श्रीकृष्ण, शिवाजी महाराज यांचे बालपण सुद्धा सुरस आणि प्रेरणादायी आहे. स्वामी विवेकानंद म्हणजेच बालपणीचा नरेंद्र. माता भुवनेश्वरीदेवी आणि विश्वनाथ दत्त यांच्यापोटी जन्मलेला नरेंद्र त्याच्या बालपणीच्या प्रसंगांतून आपल्याला बरेच काही शिकवून जातो.

महाराष्ट्रातल्या गणेशोत्सवासारखाच पश्चिम बंगालमधला दुर्गापूजेचा सण! अत्यंत उत्साहाचा, ऊर्जेचा, आनंदाचा आणि धामधुमीचा. फुललेल्या बाजारपेठा, गजबजलेले रस्ते, रमलेले बाळगोपाळ, उत्सवी खरेदी. चहूदिशांनी उत्साह ओसंडून वाहत असतो. अशाच एका दुर्गापूजेसाठी नरेंद्रच्या आईने त्यांना बाजारातून दुर्गेची मूर्ती आणण्यासाठी पाठवले.

ईश्वरभक्त असलेला नरेंद्र रस्त्याने रमतगमत चालला होता. आज दुर्गा घरी येणार म्हणून त्याच्या बालमनाला कोण आनंद झाला होता. रस्ता पार करून पुढच्या चौकात गेले की आलेच मूर्तीचे दुकान. सगळीकडे लगबग सुरु होती. नरेंद्रने मूर्ती पाहिली. त्याचं श्रद्धाळू मन हरखून गेलं. दुर्गेचं ओज, शस्त्रधारी हात, तेजस्वी डोळे, विजयी मुद्रा आणि आशीर्वादाचा हात पाहून तो मनोमन सुखावला. मूर्ती हातात  घेतली अन् खूप जपून पावलं टाकत तो निघाला. एवढ्यात त्याला लांबून येणाऱ्या घोडागाडीचा आवाज आला. मान वळवून पाहतो तर काय, एक लहान मुलगी कडेवर एक बाहुली घेऊन आपल्याच तंद्रीत रस्ता पार करत होती. चाणाक्ष नरेंद्रने क्षणार्धात जाणले की घोडागाडी त्या मुलीला मध्यरस्त्यात गाठणार आणि तिच्या अंगावरून धडधडत पुढे निघून जाणार. इतर लोक श्वास रोधून पाहू लागले. पुढे काय वाढून ठेवले आहे हे त्या मुलीच्या मात्र ध्यानीमनीही नव्हते. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच नरेंद्रने हातातली मूर्ती बाजूला भिरकावली अन् धावत त्या मुलीला उचलून पार निघून गेला. घोडागाडी धडधडत निघून गेली. लगाम खेचण्याचा प्रयत्न केल्याने घोडे खिंकाळले आणि पुढे जाऊन थांबले. सारे अवाक् होऊन पाहू लागले. नरेंद्रच्या साहसाचे सर्वांनी कौतुक केले. पण नरेंद्र मात्र मनातून खट्टू झाला. त्याच्या हातातल्या मूर्तीचा पार चक्काचूर झाला होता. घरी आलेल्या खिन्न नरेंद्राला आईने विचारल्यावर त्याने सारा प्रकार कथन केला. आईने नरेन्द्राचे कौतुकच केले.

पुढे अखिल जगाला या नरेन्द्राने हाच उपदेश केला की ‘सर्व जीवमात्रांमध्ये ईश्वर विद्यमान आहे’, ‘शिवभावाने जीवसेवा करा’, ‘दारिद्रीनारायणाची सेवा करा’. त्या उपदेशाचे मूळ आईच्या त्या शिकवणुकीमध्ये तर आहेच पण गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांचाही वाटा या विचारांच्या जडणघडणीत आहे. आणि म्हणूनच ‘जीवे जीवे शिवस्वरूपं, सदा भावयतु सेवायाम्’ अशा रीतीने शाळा, रुग्णालये यांची उभारणी रामकृष्ण मिशन ने केली.


आज संपूर्ण विश्व धार्मिक कट्टरतेच्या आणि सांप्रदायिक असहिष्णुतेच्या कालखंडातून जात असताना विश्वबंधुत्वाचा उद्घोष करणे आणि अखिल जगताला बंधुत्वाचा संदेश देणे ही कामे या भरतभूमीतूनच व्हायची आहेत. आणि त्याचा पायाच स्वामीजींनी घालून ठेवला आहे.

नरेंद्रचे वडील विश्वनाथ दत्त हे कलकत्त्यातील एक प्रतिष्ठित वकील होते. घरची परिस्थिती उत्तम होती. छोटा नरेंद्र एकदा घराच्या खिडकीत उभा होता. हिवाळ्याचे दिवस होते. बाहेरच्या गमतीजमती पाहत असतानाच नरेन्द्राचे लक्ष वेधले गेले ते एका अत्यंत गरीब माणसाकडे. त्या माणसाच्या अंगावर लज्जारक्षणापुरतेच कपडे होते. त्या थंडीत तो कुडकुडत होता आणि हळूहळू मार्गक्रमणा करत होता. एका सुभाषितात म्हटल्याप्रमाणे सज्जनांचे हृदय हे लोण्याप्रमाणे असते, परपीडा पाहून ते विरघळते. नरेन्द्राचे मन तरी द्रवल्याशिवाय कसे राहील? खोलीमध्ये नजर फिरवता वडिलांची किमती शाल झटकन नरेन्द्राच्या नजरेस पडली. कशाचाही विचार न करता त्याने ती शाल उचलली आणि धावतच खाली गेला. त्या गरीब व्यक्तिच्या अंगावर शाल पांघरल्यावर नरेन्द्राचे मन सुखावले. ती व्यक्तीही हरखून गेली. जिथे मुले आपली साधी पेन्सिल अथवा चेंडू दुसऱ्याला देत नाहीत तिथे बाल नरेन्द्राने घरातली किमती शाल त्या व्यक्तिच्या अंगावर पांघरून जणू इथल्या हजारो वर्षांच्या शिकवणुकीचा प्रत्ययच दिला. ‘परपीडा जाने रे’ या उक्तीचा व्यवहारातला धडाच जणू या कथेतून मिळतो.

Tuesday, February 26, 2013

विश्व स्वामी विवेकानंदांचे - लेखांक १.

स्वामी विवेकानंद यांचे हे १५० वे जयंती वर्ष. त्यानिमित्ताने 'श्री गजानन आशिष' या मासिकात माझी लेखमाला छापून येते आहे. तीच इथे पुनः प्रकाशित करत आहे.

विश्व स्वामी विवेकानंदांचे
स्वामी विवेकानंद म्हणताच वातावरण एकदम चैतन्यमय होऊन जाते. जगाला सद्विचार देण्यासाठी प्रचंड प्रवासाची तयारी, खडतर मार्गाचा हसतमुखाने स्वीकार, जगदुद्धाराचे भव्य स्वप्न, अदम्य उत्साह आणि अक्षय ऊर्जा म्हणजेच स्वामीजींचे जीवन.
भारतमाता ही आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी तर आहेच आणि तसे जगातले इतर देशही तेथे जन्म घेणाऱ्या लोकांसाठी असतात. परंतु भारत केवळ मातृभूमीचा दर्जा घेऊन थांबत नाही तर ती एक ‘पुण्यभूमी’ झालेली आहे. ‘पुण्यभूमी’ का, तर इथे अशा अनेक धर्मपरायण, कर्मशील, त्यागी पुण्यवंतांनी जन्म घेतला अन् आपल्या जीवनाचे तेवते नंदादीप उभे करून ठेवले ज्यामुळे त्या प्रकाशात भरतभू ‘पुण्यभूमी’ म्हणून उजळली गेली, नावाजली गेली. ‘ईश्वर्दर्शन आम्हाला घडले आहे, तुम्हालाही ते घडू शकेल. तुम्ही पापी नाही’ असा उद्घोष करणाऱ्या पुण्यावंतांची ही जननी.
धर्मरक्षणार्थ आहुती देणारे वीर-वीरांगना, शीलरक्षणार्थ अग्नीला कवटाळणाऱ्या पवित्र स्त्रिया, न्यायासाठी स्वतःची सत्ता-संपत्ती, कवच-कुंडले, अगदी मांससुद्धा निरिच्छपणे काढून ठेवणारे राजे, असुरनिर्दालनासाठी आपल्या हाडांचे अर्पण तात्काळ ठेवणारे ऋषी या सर्वांमुळे ‘पुण्यभूमी’ भारतमाता विश्वगुरूपदी आरूढ झाली होती. आज खेदाने ‘होती’ असेच म्हणावे लागते आहे. पण ही केवळ आजची परिस्थिती नाही. कालौघात संस्कारांचे अवमूल्यन, दायित्वाचे विस्मरण, निष्ठांची भेसळ, तत्वांची सरमिसळ अशामुळे विविध समाजसुधारक, संत यांनी वेळोवेळी प्राचीन तत्वांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. आणि या संतमालिकेतील एक म्हणजेच श्रीरामकृष्ण परमहंस.
श्रीरामकृष्णांचे जीवन हे खूप विलक्षण पण अत्यंत साधे. त्यांनी असा शिष्यपरिवार घडविला जो सूर्यापासून निघालेल्या किरणांप्रमाणे भारतभर तर पोहोचलाच पण पश्चिम जगतालाही अचंबित करून सोडता झाला. स्वामी अखंडानंद, स्वामी अभेदानंद, स्वामी निखिलानंद, स्वामी शर्वानंद, स्वामी तेजोमयानंद या आणि अशा त्यागमयी स्वामींनी ठिकठिकाणी आश्रम स्थापन केले, लोकांना ईश्वरसाधना करायला शिकवली, वेदांताचा म्हणजेच उपनिषदांचा सखोल अभ्यास करून त्यावर टीकेसहित भाषांतरे प्रकाशित केली. या श्रीरामकृष्णांच्या शिष्यपरिवारातले सर्वात गाजलेले नाव म्हणजे स्वामी विवेकानंद.
आज स्वामीजींची विशेषत्वाने आठवण करण्याचे औचित्य म्हणजे त्यांची १२ जानेवारी २०१३ रोजी असणारी १५० वी जयंती.
स्वामीजींचे विचार हे केवळ आध्यात्मिक नाहीत. ते व्यक्तित्वाच्या विविध पैलूंना घडवणारे आहेत. आत्मविश्वास भरणारे, शिवभावाने जीवसेवा करण्यास प्रवृत्त करणारे, त्यागाचे महत्व ठसवणारे आहेत. स्वामीजी ‘योद्धा संन्यासी’ होते. राष्ट्र आणि समाज यांचा विचार करता त्यावरही स्वामीजींचे विस्तृत साहित्य उपलब्ध आहे. अस्पृश्यता, जातिभेद यांचे निर्मूलन, स्त्रियांप्रती आदरयुक्त भावना, तीव्र देशभक्ती आणि प्रखर राष्ट्रवाद, विजिगीषु भावना यांचेच जागरण त्यांनी केले. व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी या सर्वांचा साकल्याने विचार करायला स्वामीजींनी शिकवले. ‘तुम्ही पापी आहात. जर केवळ त्याचीच भक्ती केलीत तर ईश्वर तुमची पापे माफ करेल अन्यथा नरकात जाल’ ह्या पश्चिमी जगताच्या विचाराला छेद देत स्वामीजींनी ‘तुम्ही पापी तर नाहीच. पण तुम्ही तर अमृताचे पुत्र आहात’ असा घोष केला. त्यांच्या विचाराचे पश्चिम जगताने स्वागत केले. कित्येक ठिकाणी ‘वेदांत सोसायटीज’ स्थापन झाल्या. भगिनी निवेदितांसारखे जन्माने पाश्चात्य असलेले अनुयायीही त्यांना मिळाले. पुढे श्रीरामकृष्णांचे अनेक शिष्य योजनाबद्ध रीतीने अमेरिका, इंग्लंड इथे जाऊन वास्तव्यास राहिले आणि त्यांनी ही चळवळ पुढे नेली.
जवाहरलाल नेहरुंपासून ते वीर सावरकरांपर्यंत विविध विचारधारांच्या नेत्यांनीही स्वामीजींच्या विचारांची आवश्यकता वेळोवेळी स्वीकारली आहे. आज स्वामीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने देशभर अनेक संस्था-संघटना विविध कार्यक्रम करत आहेत. जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कामरूप पसरलेल्या आपल्या देशाला स्वामीजींच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे. आजची भीषण संकटे आणि भयावह आव्हाने पाहता आपण एका सूत्रात बध्दपरिकर होऊन संघटित शक्तीच्या स्वरूपातच सामोरे गेल्यास विजयी होऊ. एकरस समाजनिर्मितीचे प्रयत्न आज व्हायला हवेत.
आबालवृद्धांची आवश्यकता डोळ्यासमोर ठेवून विविध कार्यक्रमांची योजना करावी लागेल. स्पर्धा, खेळ, चर्चा, वादविवाद, एकत्रीकरण, वाचन, साहित्य-विक्री, मनन-चिंतन ह्यातून स्वामीजींच्या विचारांचा प्रसार-प्रचार करावा लागेल. आम्ही यासाठी एका मंचाची निर्मिती केली आहे. वर्षभराच्या ह्या सर्वच कार्यक्रमात संपूर्ण समाजाचे तन-मन-धन पूर्वक योगदान लागणार आहे. हा जगन्नाथाचा रथ आपण सारे मिळून ओढूया. आपल्याला जसे जमेल तसे सहकार्य करुया. आपणही ह्या कामाबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छित असाल, सहभागी होऊ शकत असाल तर अवश्य संपर्क साधा.
जनसेवा ही ईश्वरभक्ती, बोध ह्यातला उमगूया,
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वां सांगूया ||
  

Sunday, December 16, 2012

Is Gujarat Govt. anti-Muslim?


To this modern day, in our ugly socio-politics, it has become necessary to criticize Narendra Modi and attack Gujarat Govt. to show how secular we are! That has become a fashion for self-claimed secularists who are in reality pseudo-secularists.

The Congress Govt. speaks much about religious minorities and makes a show to woo them. It has started building new(or continued with building of) Haj Houses despite Supreme Court Judgment (by Shri. Aftab Alam and Smt. Ranjana Desai JJ) to stop the Haj subsidies in phasewise manner. UPA Govt’s ‘spineless head(!)’ Mr. ‘Moun’mohan Singh depicts the famous character of ‘Dhrutarashtra’ under whose nose all sins are being committed. He went ahead in saying that Muslims of this country have first right over the resources.

Also, it has been an old and overused trick to appoint Committees and get favourable reports. It is necessary to remember few like Rajinder Sachar Committee, Rangnath Mishra Committee and U. C. Bannerjee Committee among others. Govt. acts upon such reports immediately and comes out with welfare schemes, scholarships, policies, freeships based on religion! Andhra Pradesh High Court struck down such a policy of AP State Government. For Maharashtra a similar policy was challenged in the Bombay HC; but Bombay HC failed to contemplate the dangers of the policy and could not envisage the divisive politics behind it. Now both the matters are sub-judice in the Supreme Court by way of Special Leave Petitions for ultimate decision.

But when we come to the Sachar Committee Report and Gujarat State, a very interesting piece of information I found, which is worth sharing with my readers.

Sachar Committee and its suggestion: Sachar Committee was established on March 9, 2005 under the chairmanship of Justice Rajinder Sachar to prepare a comprehensive report on the social, economic, and educational status of Muslims in Bharat. The Committee submitted its findings in November 2006.

It has suggested various measures to be taken by the Governments at Central as well as State level to elevate Muslims to a better position. The recommendation relevant here was that ‘posting a minimum of one Muslim inspector or sub-inspector in police stations which catered to a sizeable number of the minority community. This, the Sachar Committee said should be done to “not eliminate discrimination but as an initiative to build confidence”.

Thus State Governments were supposed to endeavor for this goal and implement other ideas or suggestions of the Sachar Committee.

Reality check by TOI under RTI: When Times Of India (TOI) filed and RTI query before the Home Ministry to know ‘what is the percentage of Muslims in states’ police forces’, some interesting and astonishing information has been revealed.

The highest number of Muslim police personnel is in the state of Gujarat! Then follows Assam, Kerala, W.Bengal, Tamil Nadu and Rajasthan. The picture will be clear by a look at following image. The main thing is that, states like Assam, Kerala etc. having more Muslim percentage in population than Gujarat have less percentage of policemen as compared to Gujarat. Fortunately Kerala, Assam have no BJP rule in it.

Gujarat has 5,021 Muslim police personnel in its 501 police stations compared to 2,210 Muslim cops in 451 police stations in Kerala.

State
No. of police stations
No. of police personnel
Gujarat
501
5,021
Kerala
451
2,210
West Bengal
525
2,048
Rajasthan
773
930
Jharkhand
417
616

The point which is being made here does not wish to justify the view that Sachar Committee report should be implemented. Infact on scores of issues mentioned in the Report, this author finds himself in disagreement. Many suggestions are vulnerable to criticism and rejection. The point here is to give due credit to a person who was severely blamed for spreading communal hatred. Without advertising for secularism, nearly 10 years of continuous rule in Gujarat has proved what can be a role model for other states to follow. 

Wednesday, November 28, 2012

तुमच्या माझ्यातले - मोरेश्वर आणि मोरू

मोरेश्वर उठले. ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ म्हणून त्यांनी बिछाना सोडला. अलीकडे टूथपेस्ट महाग झाल्याने त्यांनी सोसायटीतल्या कडुनिंबाच्या झाडाच्या काड्या आणायला सुरुवात केली होती. त्यातलीच एक काडी चघळत त्यांनी बायकोला चहा टाकायला सांगितला. हल्ली ते कोराच चहा पीत असत कारण वाढत्या वयातल्या मुलांना महाग झालेले दूध मिळाले पाहिजे. मग ‘गंगे च यमुने चैव’ करत थंडगार पाण्याची बादली अंगावर ओतून घेऊन ते अंग पुशीत बाहेर आले. गरम पाण्याच्या आंघोळीची एवढ्या वर्षांची सवय त्यांनी हल्ली ‘वर्षाला सहाच सिलिंडर’ म्हटल्यावर सोडून दिली होती. गीझर लावला होता पण कोळशा घोटाळ्याने वीज उत्पादन कमी झाले आणि प्रति युनिट दर मात्र वाढले. तेव्हा गीझर जळल्यापासून दुरुस्तीच्या भानगडीत ते पडलेच नाहीत. ‘प्रकृतीला बरा’ अशी स्वतःच्या मनाची समजूत घालत कोऱ्या चहाचे कडू घोट रिचवीत ते पेपरवर नजर टाकत होते... मनाला निराश करणाऱ्या १४ बातम्या वाचल्यावर शेवटी ‘सचिनला फेरारी भेट मिळाली’ आणि ‘वर्ल्ड कपची भारत-पाक  सेमिफायनल फिक्स्ड होती’ या बातम्या वाचून निःश्वास टाकत ते उठले.

बायकोने दिलेला डबा आणि नेहमीची ब्याग सांभाळत ते कचेरीला निघाले. जिना उतरत असतानाच त्यांना महापालिकेत अभियंता असलेल्या xxx चे घर दिसले. डोळे दिपतील असे दार आणि दिवाणखान्यात भिंतीवर चिकटलेला मोठ्ठा सपाट टी.व्ही. पाहतानाच त्यांना डोकं आपटू पाहात असलेला भिंतीतून बाहेर आलेला ए.सी. चुकवावा लागला. दुसऱ्याच्या घरात पाहू नये ही बालपणीची शिकवण आठवत मोरेश्वर निघाले..

उशीर झालेला असल्याने ते टॅक्सीला हात करणार तेवढ्यात त्यांच्या लक्षात आले की ह्या टॅक्सीवाल्यांची भाडे आकारण्याची पद्धत सदोष आहे असे आपण सकाळीच वाचले आहे. नक्की कोणते दरपत्रक वापरायचे यात वाद आहे आणि फसवणूक होत आहे. मोरेश्वर ना वाटले की आपली नक्कीच फसवणूक होणार.. त्यातून पुढे हिंदीत भांडायचे म्हणजे ‘थांब तुमको दिखाता है, आणि शेवटी चल पुलिस के पास...’ हे सारं कठीण होऊन बसायचं. त्यापेक्षा बसने गेलेलं बरं. मग ते बस स्टॉपवर गेले तेवढ्यात त्यांना आज वाचलेली बातमी आठवली ‘बेस्ट ची भाडेवाढ – प्रवाशांत असंतोष’. त्यांनी विचार केला एक स्टॉप चालत गेलं तर जुनंच भाडं होईल ऑफिसपर्यंत..मग स्वारी चालत निघाली. मनात हाच विचार की ‘दिवसाला थोडं तरी चालावं...प्रकृतीसाठी बरं असतं ते’. स्वतःच्या मनाचं समाधान करत असताना त्यांना वरच्या xxxचा मुलगा दिसला मोटारसायकलवरून.मात्र त्याच्या कॉलेजच्या विरुद्ध दिशेने निघाला होता तो. मोरेश्वरनी विचार करणं सोडून दिलं कारण आधीच उशीर झाला होता...

चालता चालता स्टॉपवर आले तोच बस येत होती, पण ती पूर्ण खचाखच भरली होती आणि त्यामुळे कंडक्टरने न थांबवताच ती पुढे घेतली. झालं. मोरूमधला स्वाभिमान जागा झाला पण वेळ नव्हता. तेव्हा चरफडत मोरूने टॅक्सीला हात दाखवला. ‘वो अपना XX है उधर जायेंगा क्या?’ ‘नाही साहब अब टॅक्सी छोडनी है’ म्हणत टॅक्सीवाला पसार झाला. ‘फिर रुकाईच क्यूं साला’ असं मनातल्या मनात मोठ्यांदा म्हणून मोरेश्वर घड्याळाकडे पाहात पुढच्या स्टॉपकडे निघाले. पुढच्या स्टॉपवर महेश भट्ट नामक विकृताने काढलेल्या अर्धनग्न स्त्रीच्या नव्या चित्रपटाची जाहिरात झळकली होती. मोरेश्वर मनातल्या मनात लाजले आणि ‘शिंच्याला कामधंदे नाहीत’ म्हणत पुढे निघाले. चित्रपटाच्या विचाराने पावलांनी गती घेतली होती. आपल्या काळातली गार्बो आणि मन्रो आठवत मोरेश्वर पुरते लालबुंद झाले होते. कालच कथासरित्सागर आणून दिलेल्या आपल्या मुलांचे कसे होणार ह्या चिंतेने ग्रस्त होत मोरेश्वर चौथ्या स्टॉपपर्यंत पोहोचले देखील. आता एकच स्टॉप राहिला होता. झपाझप पावले टाकत त्यांनी ऑफिसला जवळ केले. सगळे आपल्या घर्मचिंब अवताराकडे पाहात असल्याची सूक्ष्म जाणीव मनात घेऊन ते स्थानापन्न झाले. टेबलावर ठेवलेल्या फाईल्सची चळत त्यांनी जवळ खेचली...

संध्याकाळी मोरेश्वर घरी निघाले. त्यांना आठवलं घरी भाजी न्यायची आहे. अर्धाच किलो कोबी हवा होता, पण हो नाही करता करता भाजीवाल्याने अख्खा आहे म्हणून पाऊणशे किलोचा गड्डा टाकलाच पिशवीत. ३ रुपयाचा मसाला दे म्हणताच ‘साहब अभी ५ रुपयेका आता है मसाला’ म्हणत त्याने पिशवीत थोडी मिरची कोथिंबीर कोंबली. ‘तुम कम देओना लेकिन ३ रुपयेकाईच देओ’ असं बाणेदारपणे आपण म्हटल्याचं समाधान वाटत असतानाच मोरूच्या कानावर शब्द आदळले, ‘अब कहां रोते हो साहब दो रुपयेके लिये’..आजूबाजूची माणसं आपल्याकडे रोखून पाहतायत आणि गालातल्या गालात हसतायत असंही मोरेश्वरला वाटलं. पुन्हा आपला मोरू झालेला त्यांनी निमूटपणे मान्य केला आणि घरचा रस्ता धरला...

बायकोकडे भाजीची पिशवी देऊन जरा कुठे ते खुर्चीत बसत होते तर बायको करवादली ‘पुन्हा जून कोबी गळ्यात मारलान् मेल्याने, आणि मिरच्या केवढ्या कमी दिल्यात..फुकट दिल्या वाटतं!” समोरच्या घरातल्या टीव्हीवर छोट्या जेरीला पिटणारा टॉम पाहून त्यांना अचानक त्यांच्या स्वयंपाकखोलीत साडी नेसलेला आणि हातात कोबी नाचवणारा टॉम दिसू लागला. मोरेश्वर स्वतःशीच हसत बसले. टी.व्ही. लावला तर कोणत्याश्या नव्या घोटाळ्याचा खुलासा चालू होता. त्यातल्या रकमेची शून्य मोजत असतानाच त्यांना आपल्याला एक डास कडकडून चावत असल्याचे लक्षात आले. गेली कित्येक वर्षे हा डास – म्हणजे ह्याचेच सातभाई – आपले रक्त शोषत असतात आणि आपण मात्र काहीच करत नाही ह्याचे आश्चर्य वाटले मोरेश्वरना. महापालिकेचे धूर फवारणी वाले येऊन गेले की ५ दिवस बघायला नको. मग पुन्हा आहेच ये रे माझ्या मागल्या. जोपर्यंत गल्लीतला कचरा साफ होत नाही तोपर्यंत हे असेच चालायचे. पण मग निवडणुकांची बातमी टी.व्ही. वर पाहताच त्यांना वाटले की भारतालाही काही ‘डास’ चिकटून आहेत दशकांपासून...! त्यांनी असहाय्यपणे दुसरा चॅनेल लावला तर त्यावर सांगत होते ‘अब आयेगा प्रलय और होगा सृष्टी का विनाश’. मोरेश्वर बेहद्द खुश झाले...

Sunday, October 7, 2012

समाज भीषणतेचे वास्तव दर्शन : भाग - २


लहानपणी कधीतरी सर्कशीत मृत्युगोलातील चित्तथरारक कसरत पाहिल्याचे आठवते. २ मोटारसायकलस्वार त्या मृत्युगोलात अधिकच्या आकारात गोल गोल चक्र घेत असतात. अन् प्रेक्षक भयचकित होऊन तो खेळ पाहत राहतात.

मुंबईतल्या रस्त्यांवर असे मृत्युगोलातील जीवघेणे खेळ आज कित्येक जणांचे बळी घेऊन राहिले आहेत. परंतु अजूनही गांभीर्याने याचा विचार होताना दिसत नाही. हेल्मेट सक्तीचा जेवढा आग्रह पोलीस करताना दिसतात तेवढा मोटारसायकलस्वाराचं वय, लायसन्स, वेग, आवाज याबाबतीत करताना दिसत तरी नाहीत.

चारचाकी गाडी आणि दुचाकी यात सर्वात मुख्य फरक आहे तो म्हणजे ‘तोल’ सांभाळण्याचा. दुचाकी पडण्याला जास्त वाव असतो. शिवाय हेल्मेट नसेल तर डोक्याला मार लागतो अन् हेल्मेट असेल तर मान मोडण्याचा, मुरगळण्याचा संभाव असतो. तरुणाईने खरंच आपल्याला बाईक चा उपयोग किती, आवश्यकता किती अन् शौक किती याचा विचार करायला हवा.

१२ वी मध्ये शिकणारा एक स्वयंसेवक. डिझेलची ‘एन्फिल्ड’ घेऊन जेजे च्या फ्लायओव्हर वरून धडधडत चालला होता.. उतारावर तोल गेला अन् घसटत फरफटत गेला..डोक्याला जबरी मार लागून मृत झाला. त्याच्या आई वडिलांना हा खूप मोठा धक्काच होता. पण घडायचे ते घडले होते.
दुसऱ्या एका उदाहरणात २ जण चालले होते मोटारसायकलवरून. चालवणारा १२वीत अन् मागे बसलेला १०वीत. वरळी सीफेस येताच वेग घेतला १००-१२० चा. अन् काळाने झडप घातली. तोल गेला...दोघेही वाईट रीतीने फुटपाथला आपटले..१० वीतल्या मुलाचे डोके (कवटी) फुटली, चेहरा विद्रूप झाला आणि तेव्हा जो बेशुद्ध झाला तो ५ दिवस तसाच होता हॉस्पिटल मधे. आणि त्यातच निवर्तला. आई-वडिलांवर दुःखाची कुऱ्हाड. १२ वीतल्या मुलाचा खांद्यातून हात निखळला आहे, चेहरा प्रचंड सुजलाय पण सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. म्हटलं तर दोघेही अल्पवयीन. दोघांकडेही लायसन्स नाही. आणि झालेल्या गोष्टीचा फारसा अन्वयार्थ लावण्यातही काही अर्थ नाही. या वर्षभरात अशी अजून ३ उदाहरणे ऐकली. ही फार भीषण परिस्थिती आहे. पालकांनीच यावर नियंत्रण ठेवायला हवे.

बँकेतील एक बाई सांगत होत्या की त्यांच्याकडे एक माणूस आला अचानक ३५-४० हजार रुपये काढायला; जेव्हा त्याच्या खात्यात बॅलन्स फक्त लाखभर रुपयेच होता. आता बँकेतील कर्मचारी ओळखत असतात आपल्या नियमित खातेधारकांना. त्यांचे एक नातेसंबंध तयार झालेले असतात म्हणून त्या बाईंनी विचारले की काही अडचण आहे का? त्या व्यक्तीच्या कॉलेजवयीन मुलाने बाईक विकत घेण्यासाठी हट्ट धरला होता. कारण अगदी साधे सोप्पे होते..त्या मुलाच्या ‘ग्रुप’मधील सर्वांकडे मोटारसायकली होत्या! आणि हेच सार्वत्रिक चित्र आहे. कीर्ती कॉलेज, रुईया कॉलेज आणि तत्सम अन्य कॉलेजबाहेर बघा. बाईक्स ची भलीमोठी रांग असते. पूर्वी नंबरप्लेटवर ‘आई’ ‘दादा’ वगैरे लिहिलेलं असे. क्वचित ‘मी मराठा’ वगैरे. आता राजकीय पक्षाचे चट्टेरीपट्टेरी रंग दिसतात! एकमेकाची बाईक घेऊन फिरायला अन् फिरवायला नेणारी मुले दिसतील. जवळपास राहणारीच असतात..वरळी पोलीस कँप, माहीम पोलीस कॉलनी, मच्छिमार कॉलनी, दादर, बीडीडी चाळी, लालबाग-परळ इ. पण तरीही ‘गाडी’ हवीच असते. शिवाय इंधन दरवाढीचा काही फरक पडताना दिसून येत नाही. आज शिवाजी पार्कला भरधाव वेगात ‘फटफटी’ हे नाव सार्थ करत ४-४ चकरा मारणारे घनचक्कर दिसून येतात. गाडी पार्क करतानाही इंजिन चालूच. अजून एक स्टाईल म्हणजे बाईक दुकानासमोर उभी करायची चालू अवस्थेत, न्यूट्रल मधे आणि उतरून सिगारेट घेऊन पेटवून यायचं.. तोपर्यंत इंधन जळतच असतं. मग पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या मोर्चात सामील व्हायला परत मोकळे!

दुचाकीला विरोध नाही. गरजेला प्रत्येकाला चालवता आलीच पाहिजे. गावाला तर ती आवश्यकता आहे. पण जीव धोक्यात घालून, प्राणांची पर्वा न करता करायला ते काही देशरक्षण नव्हे. कॉलेजात गेलेला आपला मुलगा काय करतो आहे हे कदाचित आई-वडिलांना माहितही नसेल आणि तसे लक्ष ठेवणे शक्यही नसते, परंतु आपल्या मुलाला कितीही हट्ट केला तरी बाईक घेऊ न देणे हे तर पालकांनी निष्ठुरपणाने करायला हवे अन्यथा त्याच्या भीषण परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवायला हवी.

या लेखामुळे एखाददुसऱ्या पालकाने जरी आपला निर्णय बदलला आणि मुलाच्या हितासाठी बाईक न घेऊन देण्याच्या निर्णयावर ठाम राहिला तरी लेखनसार्थक झाल्यासारखे वाटेल.

या शृंखलेतील आधीचा लेख वाचण्यासाठी - http://vikramwalawalkar.blogspot.in/2012/10/blog-post.html

क्रमशः ...